श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज,दि.२६/१२/२०२२
गुरू गोविंदसिंग यांच्या चार साहिबजादे यांचे धर्मरक्षणासाठी बलिदान हे इतिहासातील मोठे शौर्य – डॉ. लाल सिंग खालसा
“10 वे शीख गुरू गोविंद सिंग यांनी धर्मरक्षण व राष्ट्र रक्षणासाठी आपल्या कुटुंबाचा त्याग केला, त्यांचे चार छोटे छोटे साहिबजादे जुलमी सत्तेविरूद्ध व राष्ट्रप्रेमापोटी शहीद झाले. यापैकी दोन साहिबजादे 26 डिसेंबर 1704 रोजी वयाच्या 9 आणि 6 व्या वर्षी शहीद झाले. खेळण्या बाळगण्याच्या वयात या महान वीर बालकांनी धर्मरक्षणासाठी मरण स्विकारू पण शरण जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतली व धर्मरक्षणासाठी स्वतःचे बलिदान दिले, हे आजवरच्या इतिहासातील मोठे शूर हुतात्मे आहे.
हि बलिदान वृत्ती केवळ एका धर्मासाठी नव्हे तर संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. तेव्हा राष्ट्रप्रेम व राष्ट्र रक्षणासाठी प्रत्येकाने अशी त्याग भावना अंगिकारावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी केले. ते आदर्श महाविद्यालयात आयोजित “वीर बाल दिवस” पर कार्यक्रमात बोलत होते.
“चार लहान लहान साहेबजादेंनी दिलेले बलिदान, इतिहासातील महान हुतात्म्ये केवळ ३१८ वर्षेपुर्वीचे बलिदान शौर्य गाथा सर्वसामान्यां पर्यंत पोहोचली नव्हती. ज्यांनी राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम व जुलमी राजवटी विरूद्ध लढा देऊन स्वतःचे बलिदान दिले, असा गौरवशाली दिवस “वीर बाल दिवस” यावर्षी पासून साजरा करण्याचे ठरविले त्याबद्दल मान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजे.” असे मार्गदर्शन आमदार कृष्णाभाऊ गजबे यांनी केले.
यावेळी मंचावर संस्थाध्यक्ष केवळरामजी घोरमोडे, सचिव मोतिलाल कुकरेजा, उपाध्यक्ष जगदीश शर्मा, सदस्य इंदरप्रितसिंघ टुटेजा, गुरूद्वारा सिंग सेवा सभेचे ग्रंथी साहेब मान. गुरमीत सिंग अरोरा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांचे मार्गदर्शनात महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, आदर्श इंग्लिश हायस्कूल व गुरूद्वारा सिंग सेवा सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तद्नंतर शहीद वीर बालकांवर आधार प्रेरणादायी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रम तसेच चित्रपट बघण्यासाठी आदर्श महाविद्यालय, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रितपाल सिंग टुटेजा, हरीशजी मोटवानी, प्रिन्स अरोरा, इंद्रपालसिंघ खालसा, आनंदसिंघ चावला, प्रा. अमरजीत चावला, गुरबचन मक्कड, डिंपल चावला, शट्टी सलुजा या गुरूद्वारा पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.