श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
दि..२९/११/२०२२
बल्लारपूर
मृतकांना ४० लाख तर जखमींना १५ लाख रुपये सानुग्रह निधी देण्याची उलगुलान संघटनेची मागणी
देशातील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असलेल्या बल्लारपूर येथे काल परवा मोठी दुर्घटना घडून रेल्वे ब्रिज पडले. त्यामुळे मोठी जीवित हानी झाली. या दुर्घटनेला जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर व रेल्वे डी.आर. एम. यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून जखमींना व मृत पावलेल्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली.
रेल्वे प्रशासनाला शरमेने मान खाली टाकावे लागेल अशी दुर्घटना बल्लारपूर येथे घडली. देशात दुसरा क्रमांक पटकावलेल्या रेल्वे स्थानकाची वास्तविकता या घटनेमुळे दिसून आली. मोठा गाजावाजा करून येथील मंत्री सुधीर मुनगंटीवार व रेल्वे प्रशासनाने करोडो रुपयाची रंगरंगोटी करून या रेल्वेस्थानकाला पुरस्कार मिळवून दिला. परंतु ज्या मूलभूत गोष्टीकडे लक्ष द्यावयास पाहिजे होते त्याकडे न दिल्यामुळे आजघडीला मोठी हानी घडली. रेल्वे ब्रिज कोसळल्यामुळे काही लोकांचा जीव गेला तर गंभीरित्या काही व्यक्ती जखमी झाले आहेत. सदर अपघातात मृत पावलेल्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी. मृतकाच्या कुटुंबाला ४० लाख रुपये सानुग्रह निधी देण्यात यावे व गंभीर जखमींना १५ लाख रुपये मदत देण्यात यावी. जखमींना त्यांच्या मर्जीने जिथे उपचार घेतील तिथे रेल्वे प्रशासन यांनी त्यांचा संपूर्ण खर्च सांभाळावा. तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकाला देशात दुसरा क्रमांक कसा देण्यात आला याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उलगुलान संघटनेद्वारा प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली. निवेदन देताना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, संपत कोरडे, अनिरुप पाटील, पंचशीलतान तामगाडगे, प्रदीप झामरे, सचिन मेश्राम, संजय सूर्यवंशी, गौतम रामटेके, गुरु कामटे,चंदु घाटे, शैलेश कारलेकर तथा संघटनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.



